Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
राणी हिराई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी १ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार. गोंडवाना साम्राज्याच्या पराक्रमी शासक राणी हिराई या चंद्रपूरचे वैभव आहेत. त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाच्या आणि दूरदृष्टीच्या बळावर सलग १५ वर्षे उत्तम राज्यकारभार चालवला. चंद्रपूर शहराला लाभलेली १७ किलोमीटरची भक्कम तटबंदी व महाकाली मंदिर ही त्यांच्याच कार्याची साक्ष असून, राणी हिराई यांचा इतिहास आणि आपली आदिवासी संस्कृती हा आपल्या सर्वांचा अभिमान असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. चंद्रपूरचे वैभव असलेल्या राजमाता राणी हिराई यांच्या जयंतीनिमित्त शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राणी हिराई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील आदिवासी समाजबांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय प्रतिनिधी आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, राणी हिराई यांच्या अतुलनीय कार्याला मानवंदना देण्यासाठी शहरात त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून, याकरिता १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, राणी हिराई यांचे शौर्य चित्रांच्या माध्यमातून जिवंत करण्यासाठी शहरात भव्य वॉल म्युरल तयार करण्यात येणार असून, त्यासाठी ३० लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच, चंद्रपूरची ओळख असलेल्या ऐतिहासिक कोनेरी तलाव येथे राणी हिराई यांची जीवनगाथा आणि समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक ‘लाईट व साऊंड शो’ व्यवस्था सुरू करण्याचे नियोजन केले जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. इतिहासाचा दाखला देत ते म्हणाले की, जगाच्या पाठीवर एका मुघल सम्राटाने आपल्या बेगमच्या आठवणीत ताजमहाल बांधला. मात्र, हिंदुस्थानात एका पत्नीने आपल्या पतीच्या (वीरशहा) आठवणीत 'मिनी ताजमहाल' उभारल्याचे एकमेव आणि अद्वितीय उदाहरण म्हणजे चंद्रपूरच्या राणी हिराई होत. चंद्रपूरवर राज्य करणाऱ्या २३ आदिवासी शासकांमध्ये राणी हिराई या एकमेव महिला शासक होत्या. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रजेच्या हितासाठी आपले आयुष्य वेचले. पुढील वर्षी हा जयंती महोत्सव आयोजित करत असताना, आधीच सुयोग्य नियोजन करून जिल्ह्यातील संपूर्ण समाजबांधवांना एकत्रित करण्यात येईल. या महोत्सवाची प्रचिती आणि आपला गौरवशाली इतिहास केवळ चंद्रपूरपुरता मर्यादित न राहता, तो संपूर्ण देशात व राज्यात पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला आदिवासी बांधव आणि चंद्रपूरकर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: